Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी .......
अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा

भारताचा उध्दारकर्ता महात्मा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर  -
आचार्य प्र. के. अत्रे
***************************
             
                 पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युद्धाच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले कि, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणी भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दार करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू - मुसलमानांना त्यांच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले कि, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुध्दधर्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हाल, अपेष्टा आणि छळ यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरहि प्राशन करावे लागले अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला कि, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकात जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतिक बनले. हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्यां छळाची आणि अपमानाची त्यांनी लवमात्रही पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुली आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही; अशी त्यांची जिद्द होती आणि ति त्यांनी शेवटपर्यंत खरी करून दाखविली. जो धर्म तुम्हाला कुत्र्या मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवितो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यावधी हिंदूंना ते कित्येक वर्षांपासून बजावत होते.

            माणसासारख्या माणसांना अस्पृश्य मानणारी ति तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार आहे, असे त्यांनी सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. त्यामुळे हिंदूधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले कि आंबेडकर हे गझनीच्या महंमद पेक्षाही हिंदुधर्माचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा कुर्तकोटीनी त्यांना सांगितले कि, आंबेडकरांना तुम्ही मारलेत कि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून १० आंबेडकर बाहेर पडतील. आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा हि हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला असे आंबेडकरांचे मत होते. धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्यापाशी बोलताना एकदा ते म्हणाले की, हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते; पण ह्या देशाच्या इतिहासात माझे नाव विध्वंसक म्हणून नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही.!

              हिंदूधार्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर नेहमी प्रखर टीका करीत असत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करीत हिंदू स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरत आहेत अशी पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली होती. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टीकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात जसे गांधीजींनी युध्द पुकारले तसे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणा बाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मुलभूत मतभेद होते. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर आंबेडकर आणि काँग्रेसची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजींच्या बद्दल मनात एवढी विरोधाची भावना असतांनाही केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची आपली मागणी मागे घेतली आणि पुणे करारावर सही केली. गोदशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजीचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला समजू नये याचे आम्हाला दुःख होते. पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले पण स्वतःचे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमेदपणा आणि खेळाडूपणा कॉंग्रेसने मात्र आंबेडकराशी दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेत्तर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत कि, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे जीवन गांधींनी आणि काँग्रेस ह्यांनी या देशातून नेस्तनाबूत करून टाकले.

            नऊ कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळविण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे कॉंग्रेसने काहीही केले नाही. असे असताच देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, "जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचे भंग करू शकणार नाही; आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज न उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही.!" आंबेडकरांचे हे उद्गार त्यांच्या दैदीप्यमान देशभाक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वी असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची जवाबदारी त्यांनी पत्करली. "मनुस्मृती जाळा" असे सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे.! घटना तयार झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोडबिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम बाहेर उफाळून आल्या. त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय, विषमत नष्ट होऊन हिंदू समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता, आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ति घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्दैव हिंदू समाजाचे.! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वःताचा आणि सात कोटी असहाय्य नी हीनदीन अनुयायांचा उध्दार कारणासाठी त्यांना मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुध्दांना शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.

             आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीमत्तेचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासानेची महान परंपरा चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून दुसरा कोण होता..? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते.  महार जातीत जन्माला आलेला माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणतीही एक कठीण विषय नव्हता कि ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाट्टेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती, हि गोष्ट फार थोड्या लोकाना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धिवादी असले तरीही त्यांचा पिंड धर्मनिष्ठेचा होता. भावूक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्मांचा त्यांनी तौलानिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या* उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले. त्यांना कसलेही आणि कोणतेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो, जे लिहितो ते खोटे आहे हे म्हणण्याची परमेश्वराची सुध्दा प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तीमत्वात सदैव संचारलेला असे; अनेक वर्षांच्या अध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने आंबेडकर शेवटी भगवान बुद्धांच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्याशिवाय केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच तारीख १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ५ लाख लोकांना बुध्द धर्माची दिक्षा दिली तेव्हा "सारा भारत बुध्दमय करेन" अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांनी केली. मुंबईतील १० लाख अस्पृशांना थोड्याच दिवसांनी ते बुध्दधर्माची दिक्षा देणार होते, पण अदृष्टात काही निराळेच होते.

             अन्यायाशी आणि जुलुमाशी संबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला कण न कण असुसलेला होता. भगवान बुद्धांच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेरचा आसरा मिळाला तेव्हा त्यांच्या अंतःकरणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उध्दाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाउलींच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याचे जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्ता सुध्दा लागली नाही.

             "मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदूधर्मात कधीही मारणार नाही." हि आंबेडकरांची घोषणा हिंदूधर्माविरूध्द रागाची नव्हती, सुडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी हि रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची हि शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा प्रकाश पडेल तसतसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उध्दारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे काही उज्वल आणि उदात्त आहे त्याचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचे ते महान प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे, ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत.

             बाबांचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या गुणांचे स्मरण करावयाचे ? सात कोटी अस्पृश्यांवरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार..? आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू तरी कोण पुसणार..? त्यांनी ध्यानात धरावे कि, भारताच्या इतिहासात आंबेडकर आणि त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला आणि प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उध्दार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चरित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने जर आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट करण्याचा प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उध्दार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांना अभिवादन करतो..

 (आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा दैनिक "मराठा" मध्ये दिनांक ०७-१२-१९५६ रोजी प्रकाशित झालेला लेख)(संकलित)
***************************

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस